जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गावांमध्ये नादुरूस्त सेप्टीक शौचालयाच्या कामाची दुरूस्ती आणि एक खड्डा शौचालय असणा-या कुटुबांना दोन खड्डा शोषखड्डा शौचालय तयार करण्यासाठी 1 ते 15 डिसेंबर या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. ही मोहीम मिशन मोडवर राबवावी असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांनी केले. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील गावांमध्ये शाश्वत स्वच्छता टिकवून ठेवण्यासाठी नादुरुस्त शौचालयाची दुरुस्ती, एक शौचालयाचे रुपांतर दोन खड्ड्यात करण्याची मोहीम 1 ते 15 डिसेंबर या कालावधीत राबविण्याचे निर्देश दिले आहेत. या मोहिमेच्या पूर्व तयारीसाठी जिल्हयातील सर्व तालुकास्तरीय अधिकारी कर्मचारी, सर्व सरपंच, सर्व ग्रामविकास अधिकारी / ग्रामसेवक, गटविकास अधिकारी यांची ऑनलाइन कार्यशाळा झाली. या कार्यशाळेत जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक दादाभाऊ गुंजाळ यांनी मार्गदर्शन केले. ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य चांगले रहावे, परिसरात स्वच्छता रहावी यासाठी नादुरूस्त सेप्टीक शौचालयाच्या कामाची दुरूस्ती, एक खड्डा शौचालय असणा-या कुंटुबांना दोन खड्डा शोषखड्डा शौचालय तयार करण्याबाबतचे अभियान राबविण्याचे निर्देश मनुज जिंदल यांनी दिले आहेत.