ग्रामीण भागात ‘मिशन ब्रेक द चेन’ च्या कडक अंमलबजावणीचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी रुपाली सातपुते यांनी दिले आहेत. कोरोनाची दुसरी लाट गावात पसरू नये यासाठी ग्रामपंचायत मार्फत प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु असून ‘मिशन ब्रेक द चेन’ च्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीने आरोग्य सर्वेक्षण, कोरोना चाचणी, लसीकरण आणि गृहविलगीकरणावर प्रामुख्याने भर देण्यात येत आहे. ज्या ग्रामपंचायती शहराजवळ आणि लोकसंख्येने मोठ्या आहेत, अशा ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रुपाली सातपुते यांनी आज ग्रामसेवक आणि सरपंच यांच्याशी संवाद साधून सध्यस्थितीचा आढावा घेतानाच गावातील सरपंच तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी पुढाकार घेवून आपले गाव कोरोनामुक्त करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही केले. ‘मिशन ब्रेक द चेन’ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासनाने निर्गमित केलेले सर्व नियम ग्रामीण भागात लागू असून त्याची प्रभावी अंमलबजावणी करतानाच नागरिकांनी मास्क लावणे, अनावश्क गर्दीच्या ठिकाणी वावर टाळणे, सॅनिटाझरचा वापर करण्याचे आवाहनही सातपुते यांनी केले आहे. जे नागरिक मास्क वापरणार नाहीत अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. त्याचबरोबर ४५ वर्षावरील सर्व नागरिकांनी कोविड प्रतिबंधात्मक लस घेण्याचेही आवाहन त्यांनी केले आहे. यावेळी कोन आणि इतर गावातील सरपंचानी गावात केल्या जाणा-या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची चर्चा केली. ग्रामीण भागात सद्यस्थिती 1 हजार 54 रुग्ण उपचार घेत असून आतापर्यंत 20 हजार 115 रुग्ण बरे झाले आहेत. ग्रामीण भागात कोरोनाचा अटकाव करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्व यंत्रणा युद्धपातळीवर अहोरात्र कार्यरत असून शासनाने निर्गमित केलेल्या नियमांचे पालन करून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाने केले आहे.