महापालिकेचा अर्थसंकल्प गेल्यावर्षी महासभेत मंजूर होऊनही अद्यापही त्यावर सह्या करण्यास ठाण्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षनेते यांना वेळ नाही, मंजूर अर्थसंकल्पावर अद्याप सह्या न करणाऱ्यांनी 18 लाख ठाणेकरांचा अपमान केला आहे, असा घणाघाती आरोप भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक कृष्णा पाटील यांनी केला आहे. ठाणे महापालिकेचा 2021-22 चा अर्थसंकल्प 23 मार्च रोजी वेबिनार महासभेत मंजूर करण्यात आला होता. मात्र वर्ष होऊन गेले तरी या अर्थसंकल्पावर अद्याप महापौर, सभागृह नेते आणि विरोधी पक्ष नेते यांच्या सह्या झालेल्या नाहीत. त्यामुळे हा १८ लाख ठाणेकरांचा अपमान आहे कृष्णा पाटील यांनी म्हटले आहे.
महापालिका प्रशासनाने २ हजार ७५५ कोटी ३२ लाखांचा अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर केला होता. त्यामध्ये स्थायी समितीने ४९१ कोटींची वाढ करत ३ हजार २४६ कोटी ३२ लाख करून महासभेपुढे मंजुरीसाठी सादर केला होता. हा अर्थसंकल्प महासभेत मंजूरही करण्यात आला. मात्र त्यावर महापौर, सभागृह नेते आणि विरोधी पक्षनेते यांनी सही करून प्रशासनाकडे आज पर्यंत पाठविला नाही. त्यामुळे प्रशासनाने पाठविलेल्या महसुली प्रस्तावांवर काम होत असून भांडवली खर्चाची कामे प्रलंबित आहेत, असा आरोप कृष्णा पाटील यांनी केला आहे. ज्यांना मंजूर अर्थसंकल्पावर सह्या करून प्रशासनाला देता येत नाही ते शिवसेना-राष्ट्रवादी चे लोकं ठाण्याच्या विकासाच्या गप्पा मारत आहेत , हे हास्यास्पद आहे.दोघेही एकत्रितपणे 18 लाख ठाणेकरांची फसवणूक करत असल्याचा आरोप कृष्णा पाटील यांनी केला आहे.