गायमुख येथील बाळासाहेब ठाकरे चौपाटीचा दुसरा टप्पा मे अखेरपर्यंत पूर्ण होणार असून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण केलं जाणार आहे, ही माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली. बाळासाहेब ठाकरे चौपाटीचा पहिला टप्पा नागरिकांसाठी खुला करण्यात आला होता, पण करोनामुळे चौपाटी नागरिकांसाठी बंद असल्याने तिची दुरावस्था झाली होती. साफसफाई आणि देखभाल करण्याची जबाबदारी ही मेरीटाईम बोर्डाची असल्याने आमदार प्रताप सरनाईक यांनी पाठपुरावा करून याबाबतच्या निविदा काढण्यास लावल्या. आता प्रताप सरनाईक यांच्या आमदार निधीतून चौपाटीच्या डाग…. चे काम सुरू करण्यात आले आहे. काल आमदार प्रताप सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह या चौपाटीची पाहणी केली. या चौपाटीवरील विसर्जन घाट दशक्रिया घाट पूर्ण करण्यास सांगण्यात आले असून लँडस्केपिंग गार्डन, सायकल ट्रॅक, जॉगिंग ट्रॅक ही सर्व काम पावसाळ्यापूर्वी म्हणजे मे अखेरपर्यंत पूर्ण करण्यास सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना सांगितले आहे. भाईंदर पाडा येथील आठशे मीटर लांबीची असलेली चौपाटी पुढे अडीच किलोमीटर होणार आहे. त्याचा फायदा घोडबंदर वासियांना मोठ्या प्रमाणावर होणार आहे. या चौपाटीचे काम पूर्ण झाल्यानंतर राज्यातील खाडी किनाऱ्यावर सहा किलोमीटर लांबीची सर्वात मोठी चौपाटी होणार असून यामध्ये कनोजी आंग्रे यांच्या आरमाराची प्रतिकृती उभारली जाणार आहे. या चौपाटीचा विकास एक पर्यटन केंद्र म्हणून केला जाईल असे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले.