ठाणे शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न सोडवण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या क्लस्टर योजनेला हाजूरी गावठाणमधील भूमिपुत्र आणि रहिवाशांनी एकजुटीने विरोध दर्शवला आहे.कोळीवाडे आणि गावठाण क्लस्टरमधून वगळण्यात न आल्याने सर्व नागरिकांनी हाजूरी भागाचा स्वयंविकास करण्याचा निर्धार काल झालेल्या सुनावणीत व्यक्त केला.त्यामुळे क्लस्टरमधून स्वतःचे उखळ पांढरे करण्याची स्वप्ने पाहणाऱ्या विकासक आणि राजकारण्यांना एकप्रकारे चपराक बसली आहे.ही सुनावणी ठाणे महापालिका उपायुक्तांच्या समक्ष पार पडल्याने क्लस्टरच्या मनमानीविरोधात जनशक्ती एकवटू लागल्याचे दिसून येत आहे.हाजुरी परिसरात सुमारे 13 गृहसंकुले आणि 2000 झोपडपट्टीवासियांचा समावेश आहे.यामधील अनेक इमारती धोकादायक बनल्याने क्लस्टर योजना राबवण्याचे ठरवले.याबाबत शासनाने अधिसूचना काढून हरकती आणि सूचना मांडण्याचे आवाहन नागरिकांना केले होते.त्यानुसार,काल नौपाडा प्रभाग समितीमध्ये अपिलीय अधिकारी,उपआयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या अध्यक्षतेखालील जनसुनावणी झाली.हाजुरी गावठाण आणि परिसरातील नागरिकांनी क्लस्टर योजनेला असलेला विरोध लेखी आणि तोंडी स्वरूपात सुनावणी अधिकाऱ्यांसमोर मांडला.ठाण्यातील कोणत्याही गावठाण, कोळीवाडा, पाडे यांचे सीमांकन आणि विस्तारित सिमांकन झाले नाही. यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या तोंडी आश्वासना नुसार कोळीवाडे आणि गावठाण क्लस्टर योजनेतून वगळण्यात आली.मात्र,प्रत्यक्षात हाजुरी गावठाण आजदेखील का वगळण्यात आलेले नाही.असा सवाल नागरिकांनी केला.कोळीवाडा आणि गावठाण साठी नवीन डीसीआर बनविण्यात यावे यासाठी गावठाण-कोळीवाडे, पाडे संवर्धन समिती तर्फे शासन दरबारी पत्रव्यवहार सुरु आहे,मुंबईतील गावठाण कोळीवाड्यांचे विस्तारित सिमांकानाचे काम चालू आहे.ते पूर्ण होताच ठाणे तसेच इतर सागरी जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील इतर ठिकाणी सीमांकन सुरू होईल.असे आश्वासन शासनकर्त्याकडून मिळालेले आहे.या पार्श्वभूमीवर कोळीवाडे गावठाण हे स्वतःचा विकास स्वतः करणार असून स्वयं विकास योजना राबविणार आहेत.