कोविडच्या प्रादुर्भावामुळे सार्वजनिक उत्सव साजरे करण्यासाठी नागरिकांकडून सक्तीने वर्गणी गोळा करु नये असे शासनाचे निर्देश असल्याने सर्वच नवरात्रौत्सव मंडळांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. नवरात्रौत्सव मंडळांना दिलासा मिळावा यासाठी महापालिकेच्या माध्यमातून आकारण्यात येणारे मंडपभाडे पूर्णपणे माफ करण्यात आले असल्याची माहिती महापौर नरेश म्हस्के आणि पालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी दिली. दरवर्षी महापालिका कार्यक्षेत्रात विविध सार्वजनिक नवरात्रौत्सव साजरा करण्यात येतो. परंतु मागील वर्षापासून कोरोनाचे संकट असल्याने सर्वच क्षेत्रात आर्थिक संकट ओढवले आहे. ही सार्वजनिक मंडळे नागरिकांकडून वर्गणी जमा करुन नवरात्रौत्सव साजरा करीत असतात. परंतु कोणत्याही नागरिकांकडून वर्गणी घेवू नये असे शासनाचे निर्देश असल्यामुळे या मंडळापुढे नवरात्रौत्सव साजरा करण्याबाबत आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. नवरात्रौत्सव परंपरा खंडित होवू नये आणि शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नवरात्रौत्सव साजरा व्हावा यासाठी महापालिकेच्या वतीने नवरात्रौत्सव मंडळाचे मंडप भाडे माफ करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेच्या ऑगस्ट महिन्याच्या सर्वसाधारण सभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. वर्षी कोरोना जरी आटोक्यात असला तरी तो पूर्णपणे संपलेला नाही याची जाणीव ठेवून यंदाचा नवरात्रौत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून ठाणेकरांनी देखील नवरात्रौत्सव साध्या पध्दतीने साजरा करून मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करुन महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापौर आणि पालिका आयुक्तांनी केले आहे.