कोरोनामुळे यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत गणपती विसर्जनातही घट झालेलीच पहायला मिळाली. काल अनंत चतुर्दशीच्या दिवशी २१ हजार ६११ घरगुती तर २६० सार्वजनिक गणेश मूर्तींचं महापालिकेनं विविध घाटांवर निर्माण केलेल्या १६ ठिकाणच्या विसर्जन व्यवस्थेत विसर्जन झालं. तर मूर्ती स्वीकार केंद्रांवर ४६१ गणेश मूर्ती स्वीकारण्यात आल्या. उपवन तलावावर सर्वाधिक म्हणजे ३ हजार ३८ घरगुती तर १६ सार्वजनिक गणेश मूर्तींचं विसर्जन झालं. तर सर्वात कमी म्हणजे १८५ घरगुती गणपतींचं खिडकाळी तलाव येथे विसर्जन झालं. मासुंदा तलावावर २ हजार ९१६, रायलादेवी तलाव येथे ३ हजार ८२८, कोलशेत घाटावर २ हजार ३७, दातिवली घाट १ हजार ९९४, तर मीठबंदर घाटावर १२८८ घरगुती गणपतींचं विसर्जन झालं. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा १३ हजार ९४३ गौरी-गणपती मूर्ती विसर्जनामध्ये घट झाली. गेल्यावर्षी एकूण ३७ हजार ६० मूर्तींचं विसर्जन झालं होतं तर यंदा २३ हजार ११७ मूर्तींचं विसर्जन झालं. गेल्यावर्षी ३४ हजार २८५ घरगुती गणपतींचं तर यंदा २१ हजार ६११ म्हणजे १३ हजार २१४ मूर्तींची घट झाली. गेल्यावर्षी ९५७ तर यंदा २६० सार्वजनिक गणपती म्हणजे ६९७ सार्वजनिक गणपती विसर्जन मूर्तींमध्ये घट झाली. गेल्यावर्षी ५१० तर यंदा ४६१ गणेश मूर्ती स्वीकृती केंद्रावर स्वीकारण्यात आल्या. यामध्येही ४९ मूर्तींची घट झाली. गेल्यावर्षी १ हजार ३०८ तर यंदा ७८५ गौरींचं विसर्जन झालं. यामध्येही ५२३ गौरींची घट झाली. कोरोनाच्या काळामध्ये महापालिकेनं केलेल्या पर्यायी विसर्जन व्यवस्थेला चांगला प्रतिसाद मिळाला. दीड दिवसांचे एकूण ७ हजार ७४०, ५ दिवसांचे एकूण २ हजार २३७, ६ दिवसांचे एकूण ८ हजार ७९३, ७ दिवसांचे एकूण १ हजार ९९ तर दहाव्या दिवसाचे एकूण ३ हजार २४८ गणपतींचं विसर्जन झालं. तर ७८५ गौरींचं विसर्जन झालं.