कोरोनाच्या लसीकरणाच्या दुस-या टप्प्यात योग्य नियोजनाअभावी गोंधळाचं वातावरण

कोरोनाच्या लसीकरणाच्या दुस-या टप्प्यात सध्या गोंधळाचं वातावरण आहे. १ मार्च पासून कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे. या टप्प्यामध्ये शासकीय तसंच खाजगी रूग्णालयांमधूनही लसीकरण केलं जाणार आहे. प्रत्यक्षात मात्र निर्णय झाला असला तरी त्याची अंमलबजावणी योग्य पध्दतीनं झाली नसल्यामुळं गोंधळाचं वातावरण आहे. ठाणे महापालिकेनं १५ खाजगी केंद्रातून दुस-या टप्प्यातील लसीकरण केलं जाणार असल्याचं जाहीर केलं आहे. मात्र या लसीकरणासाठी नेमलेल्या खाजगी केंद्रांनाच याची कल्पना नसल्यामुळं त्याचा फटका लसीकरणासाठी येणा-या नागरिकांना बसत आहे. काल आणि आजही असा त्रास अनेक ठिकाणी झाला. काल काही खाजगी केंद्रात लसीकरणासाठी गेलेल्या नागरिकांना लसीकरणाशिवाय परतावं लागलं. या केंद्रामध्ये लसींचा पुरवठाच झाला नसल्यामुळं कधीपासून लसीकरण सुरू होणार याची कल्पनाच त्यांना नव्हती. आजही काही केंद्रात असा गोंधळ झाला. लसीकरणासाठी आलेल्या काही नागरिकांना ताटकळत बसावं लागल्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळं उद्देश चांगला असला तरी अंमलबजावणी झाली नसल्यामुळं त्याचा काहीच फायदा होऊ शकला नाही.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading