कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोकण विभागात मनरेगा अंतर्गत 2 हजार 170 कामांना सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी 8 हजार 908 कामगारांनी हजेरी लावल्याची माहिती कोकण विभागाचे महसूल आयुक्त शिवाजी दौंड यांनी दिली आहे. कोकण विभागातील जिल्हयांतर्गत कृषि, वनपरिक्षेत्र, वनप्रकल्प विभाग, सामाजिक वनीकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, रेशीम विकास अशा विविध विभागांमार्फत कामं सुरू करण्यात आली आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनची कालमर्यादा ३० एप्रिल पर्यंत आहे. परंतु ग्रीन झोन सारख्या ठिकाणी जेथे कोरोना बाधीतांची संख्या कमी आहे अशा क्षेत्रांमध्ये लघुउद्योग, जीवनावश्यक वस्तूंच्या निर्मितीचे कारखाने, औषध निर्माण करणाऱ्या कंपन्या यांना सोशल डिस्टंसिंगचे नियम तसेच शासनाने ठरवून दिलेल्या अटीशर्तींनुसार कामकाज सुरु करण्यास शिथीलता दिली आहे. यामध्ये रस्तेदुरुस्ती, नवीन रस्त्यांचे बांधकाम, नाले सफाई, नवीन नाल्यांचे बांधकाम, छोटया नद्यांवरील मोऱ्यांची दूरुस्ती अशा कामांचा समावेश आहे.
लॉकडाऊच्या काळात हातावर कमवणाऱ्या मजूर वर्गाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले होते त्यामुळे शासनाच्या या धोरणामुळे या वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.