यशवंत पंचायत राज अभियान २०२२-२०२३ मध्ये राज्यातील अतिउत्कृष्ठ जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांना विभाग आणि राज्यस्तरावर पुरस्कार प्रदान करणेबाबत आदेश निर्गमीत करण्यात आले आहेत. कोकण विभागस्तरीय पुरस्कारामध्ये पंचायत समिती शहापूरला तृतीय क्रमांकाचा अत्युत्कृष्ट पंचायत समिती म्हणून पुरस्कार जाहीर झाला आहे. २०२१-२०२२ या अहवाल वर्षामध्ये केलेल्या कामाचे मुल्यमापन विचारात घेऊन विभागस्तर आणि राज्यस्तर अशा दोन स्तरावर “यशवंत पंचायत राज अभियान” ही अभिनव पुरस्कार योजना यावर्षी देखील राबविण्यात आली होती. या अभियांनातर्गत राज्यातील 3 पंचायत समित्यांची पुरस्कारासाठी राज्य स्तरावर निवड करण्यात येते व विभाग स्तरावर 3 पंचायत समित्यांची निवड करण्यात येते. यामध्ये पंचायत राज प्रशासन आणि विकास कार्यात उत्कृष्ठ काम करणाऱ्या पंचायत समित्यांची निवड केली जाते. पंचायत समितीच्या किमान सभेचे आयोजन करणे, पंचायत समिती रचना आणि कार्यपध्दती, कर्मचारी व्यवस्थापन, अंगणवाडीतील मूलभूत सुविधा/ परिसर सुधारणा, आरोग्य विभागाकडील प्रसुतीपुर्व नोंदणी, संस्थात्मक प्रसुती, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना, ग्रामीण गृह निर्माण, राज्य ग्रामीण जीवनोन्नत्ती अभियान, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत हगणदारी मुक्त गाव, सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन, बेसलाईन सर्व्हे बाहेरील कुंटुंबाचे शौचालय बांधकाम, म.ग्रा.रो.ह.योजना अंतर्गत मनुष्य दिवस निर्मिती यासारख्या कामामध्ये उल्लेखनीय काम केलेल्या तसेच शिक्षण विभागाकडील शालेय आरोग्य तपासणी, जिल्हा परिषदेच्या शाळा डिजीटल करणे, ग्रामपंचायत करवसुली ,शाश्वत विकास ध्येय आणि जिल्हा परिषद विकास आराखडा अशा विविध विकास कामांमध्ये उल्लेखनिय काम केल्याबद्दल पंचायत समिती शहापूरला कोकण विभागीय स्तरावराचा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार शासनाकडून जाहीर झाला आहे.