जिल्हा कौशल विकास, रोजगार, उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत पंडित दीनदयाल उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते ज्याद्वारे अगदी दहावी पास उमेदवारांपासून बीई, एमबीए अशा विविध पदवी प्राप्त उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली.
या कार्यक्रमाला तीन हजाराहून अधिक नोकरी इच्छुक उमेदवारांनी उपस्थिती नोंदवली. 48 कंपन्यांनी एकूण 2535 पदासाठी मुलाखती घेतल्या. यावेळी 743 उमेदवारांची प्राथमिक निवड झाली तर 35 जाणांची अंतिम निवड झाली.
दहावी-बारावी पास, पदविका धारक, पदवी धारक, विविध शाखांमधील अभियंते, आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थी, मॅनेजमेंट, एम. बी. ए. अशा विविध पात्रता धारक महिलांसाठी मेळाव्यामध्ये नोकऱ्या उपलब्ध करून देण्यात आल्या. बीपीओसाठी विविध प्रादेशिक भाषा जाणणारे उमेदवार, बैंक जॉब, एचआर अॅडमिन, हाऊस केअरनर्स, आयटी जॉब्स, बँक ऑफिसर, ऑन फिल्ड सर्व्हे एक्झिक्युटिव्ह, एचआर, अकाऊंटंट अशा विविध पदांसाठी कंपन्यांनी मुलाखती घेतल्या. घर बसल्या काम करण्यासाठी ही बजाज अलायन्ससारख्या काही कंपन्यांनी मुलाखती घेतल्या.
ओएसएएचआर सोलुशन्स, पितांबरी प्रोडक्ट्स, क्वेस कॉर्प लिमिटेड, डेझा विव्ह्यू स्किल्स, युनिकेअर, हेल्थकेअर, आरंभ फार्मा, SABR Recruitment, संकल्पन इन्फ्रा, बजाज अलायंस, वन पॉइंट वन, V५ ग्लोबल सर्व्हिसेस, अभिनव इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी, रेडियंट कन्सल्टंट, टाटा एआयजी, टीव्हीएस, एलआयसी, पेटीयम, अमेझॉन, फ्लिपकार्ट, Myntra इत्यादी कंपन्यांनी त्यांच्याकडील विविध रिक्त जागांसाठी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या.
या बरोबरच बेरोजगार उमेदवारांना स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शन देण्यासाठी मेळाव्यामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळानी सहभागी होत उमेदवारांना विविध योजनांची माहिती दिली.