बेरोजगारी विरोधात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारचा निषेध करत “रोजगार द्या” अशी मागणी करत ठाण्यात आंदोलन करण्यात आले. मोदी सरकार मोठ्या प्रमाणात जनतेची फसवणूक करत असून अनेकांच्या बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोना काळातही केंद्र सरकारकडून जनतेला कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही. याच पार्श्वभूमीवर युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ‘रोजगार दो’ अशा घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केलं. मोदी सरकार रोजगार दो च्या घोषणा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिल्या. यावेळी वाढत्या बेरोजगारीच्या समस्येकडे केंद्र सरकार सोयीस्करपणे डोळेझाक करणाऱ्या मोदी सरकारने युवकांसाठी रोजगार निर्मितीच्या कामाकडे लक्ष द्यावे यासाठीचे निवेदन जिल्हाधिका-यांना देण्यात आले. लॉकडाऊन मुळे रोज करोडो लोकांच्या नोकऱ्या जात आहेत मागील ७० दिवसात १२ कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत असे असताना सरकार सुशांत सिंग,कंगना राणावत यासारख्या मुद्द्यांना रोज पुढे आणून मुळ मुद्द्यांना बगल देत आहे. परंतु करोडो लोकांच्या नोकऱ्या गेल्यात लोक आत्महत्या करतात याबाबत मात्र मोदी सरकार काही बोलत नाही म्हणून केंद्र सरकारच्या विरोधात आम्ही आंदोलन करत असल्याचे यावेळी युवक काँग्रेस प्रदेश अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी सांगितले. केंद्र सरकार अशीच जनतेची फसवणूक करणार असेल तर कॉंग्रेसला आक्रमक व्हावं लागेल. त्यामुळे सरकारने तरुणांना रोजगार त्वरित उपलब्ध करावा अन्यथा कॉंग्रेसला अजून तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा सत्यजित तांबे यांनी दिला आहे.