कुटुंबातील प्रत्येकाकडे काही ना काही गुण असतात. त्या गुणांना ओळखून त्यानुसार त्या त्या व्यक्तीला संधी दिली तर कुटुंबातील सर्वांच्या विकासाचा मार्ग मोकळा होतो, असा महत्वाचा संदेश ठाण्यातील सुप्रसिद्ध वकील ॲड. संजय बोरकर यांनी ठाण्यात दिला. समता विचार प्रसारक संस्थेने आयोजित केलेल्या एकलव्यांच्या समता कुटुंब मेळाव्यामध्ये ते बोलत होते. यावेळी त्यांच्याबरोबरच त्यांच्या पत्नी सुप्रसिद्ध लेखिका, निवेदिका हर्षदा बोरकर, त्यांची सून सुप्रसिद्ध अभिनेत्री शर्वरी कुलकर्णी बोरकर आणि त्यांचा उद्योजक मुलगा विभव बोरकर सहभागी झाले होते. संस्थेचा एकलव्य कार्यकर्ता दीपक वाडेकर याने मुलाखतीतून बोरकर कुटुंबियांना बोलते केले. हर्षदा बोरकर म्हणाल्या की कुटुंबात सुसंवाद होत असेल तर ते कुटुंब एकत्र आनंदात राहतं. आपल्याला हवं ते करायला मिळावं यासाठी कुटुंबात हट्टी असू नये. संधी मिळण्याची वाट पहावी. शर्वरी कुलकर्णी यांनी सांगितलं की, आमचे एकत्र कुटुंब आहे आणि आम्हाला सगळ्यांना आपल्या आवडी निवडी सांभाळण्याची पूर्ण मोकळीक आहे आणि हेच आमच्या सुखी कुटुंबाचं रहस्य आहे. विभव बोरकर म्हणाला, बायको आणि आई यांची मैत्री असल्यामुळे घरात मला कधीच तणावाला सामोरं जावे लागत नाही.