ठाणे शहरातील किसननगर वागळे इस्टेट परिसरात राबवण्यात येणा-या समूह विकास योजनेला मंजुरी मिळाली असून यामुळे १० लाख लोकांना हक्काचं घर मिळणार आहे. किसननगर वागळे इस्टेट परिसरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत धोकादायक इमारतींमध्ये १० लाखांहून अधिक नागरिक राहतात. या रहिवाशांना सुरक्षित असे स्वत:चे हक्काचे घर मिळावे यासाठी गेल्या अनेक वर्षापासून शासन स्तरावर सुरू असलेल्या पाठपुराव्याला यश आलं आहे. किसननगर आणि जयभवानी नगर एकमेकांना जोडले जाणार असून या पहिल्या टप्प्याला तत्वत: मान्यता मिळाली आहे. या योजनेत प्रत्येकाला ३०० चौरस फूटाचं घर मोफत मिळणार आहे. त्याचप्रमाणे या संपूर्ण जागेचा सुनियोजित विकास केला जाणार आहे. प्रायोगिक तत्वावर किसननगर आणि वागळे इस्टेट येथे राबवण्यात येणा-या योजनेचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर लोकमान्यनगर, राबोडी येथे ही योजना राबवण्यात येणार आहे. समूह विकास योजनेत ६ मीटर ऐवजी ३० मीटरचे रस्ते होणार आहेत. रस्त्यांच्या सीमांकनामध्ये सुमारे ६०० घरं असून ६०० कुटुंबांचं स्थलांतर करण्यासाठी आधी भाडेतत्वावर घरं उपलब्ध करून दिली जाणार असून त्यानंतर या रहिवाशांना स्थलांतर करण्याची कार्यवाही केली जाणार आहे.