माहिती म्हणजे ज्ञान नव्हे. पुस्तकांची आणि शिक्षणाची कास धरा. चांगले पहा, चांगले वाचा. चर्चा करा. कितीही आव्हाने आली तरीही शिक्षणाची कास सोडू नका. ग्रंथांसारखा गुरु नाही तसा ग्रंथांसारखा मित्रही नाही. असे मौलिक मार्गदर्शन सुप्रसिद्ध अभिनेत्री चिन्मयी सुमित यांनी समता विचार प्रसारक संस्थेने आयोजित केलेल्या 30 व्या एकलव्य गौरव पुरस्कार सोहळयात बोलताना केले. भारतीय संविधान हे जगातिल श्रेष्ठ संविधानापैकी एक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांबद्दल जवळीक आहे. भारतीय समाजाचा खरा इतिहास जाणून घ्या. आपल्या हक्कांबरोबरच आपले कर्तव्य जाणून घ्या. यश तुमचीच वाट पाहत आहे असं चिन्मयी सुमित यांनी सांगितलं. राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भीमराव जाधव मुलांशी संवाद साधताना म्हणाले, जगात जेवढी महान लोकं झाली ती विषम परिस्थितीतून घडलेली आहेत, त्यामुळे परिस्थितीला न घाबरता तोंड द्यायची ताकद निर्माण करा. स्वतःच्या बिकट परिस्थितीतून मिळवलेल्या प्रगतीबद्दल संगत ते म्हणाले आयुष्यात संकटे येणारच, पण न डगमगता यशाची कास धरत पुढे जा असं सांगितलं. समता विचार प्रसारक संस्था गेली 30 वर्षे सातत्याने ठाण्यातील कठीण आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीला तोंड देत दहावीत यश मिळवणार्या एकलव्य विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांना प्रशस्तीपत्र आणि रोख पुरस्कार देते. या पुरस्काराचे हे 31वे वर्ष आहे. यावर्षी ठाणे महापालिकेच्या मानपाडा, सावरकर नगर, ढोकाळी, किसन नगर, धर्मवीर नगर, बाळकुम, कोपरी, कळवा, येऊर येथील माध्यमिक शाळांतील ३३२ जणांची निवड करण्यात आली होती. त्यामध्ये १४ विद्यार्थी ८० टक्क्यांहून जास्त गुण मिळवणारे तर १८२ विद्यार्थी प्रथम वर्गात उत्तीर्ण झाले आहेत. कार्यक्रमात २२२ विद्यार्थ्यांनी सत्कार स्वीकारला. वंचितांच्या रंगमंचावर गाजलेल्या दोन नाटिका यावेळी सादर करण्यात आल्या.