काशीनाथ घाणेकर नाट्यगृहातील उद्वाहन आणि साफसफाईसह इतर सुविधांकडे लक्ष द्यावं असे आदेश महापौर नरेश म्हस्के यांनी दिले आहेत. चित्रपट दिग्दर्शक विजू माने हे काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या उद्वाहनात अडकले होते. या घटनेनंतर महापौरांनी तातडीनं बोलावलेल्या अधिका-यांच्या बैठकीत हे आदेश दिले. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात समस्यांची मालिका सुरू आहे. विजू माने हे काल १० मिनिटं उद्वाहनात अडकले होते. तेथील कर्मचा-यांनी त्यांना सुखरूप बाहेर काढले मात्र अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रशासनानं तातडीनं कार्यवाही करावी असे आदेश महापौरांनी या बैठकीत दिले. नाट्यगृहात साफसफाई होत नसून कर्मचारी वर्ग अपुरा असल्याचं सांगितलं जातं. यासाठी तीन पाळ्यांमध्ये सफाई कर्मचारी नेमण्याचे आदेश महापौरांनी यावेळी दिले. राम गणेश गडकरी रंगायतन आणि काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात हजारो ठाणेकर येत असतात. त्यामुळं कोणतीही हयगय होऊ नये असं सांगून काही अधिकारी नेमून दिलेल्या कामात दिरंगाई करत असल्याचा आरोप महापौरांनी यावेळी केला.