राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने 31 ऑक्टोंबर ते 13 नोव्हेंबर या दरम्यान कारागृहातील शिक्षाबंदी आणि न्यायाधीन तसेच निरिक्षणगृहातील बालकांसाठी कायदेविषयक जनजागृती अभियान आणि हक्क हमारा भी तो है @75 अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचे उद्घाटन ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ईश्वर सुर्यवंशी आणि ठाणे मध्यवर्ती कारागृहाचे अधिक्षक हर्षद अहिरराव यांच्या हस्ते ठाणे कारागृहात करण्यात आले. यावेळी 500 बंदीजनांची मुलाखत घेण्यात आली. हे अभियान 13 नोव्हेंबरपर्यंत सुरु राहणार असून या कालावधीत विविध कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या अभियानाअंतर्गत नागरिक तसेच कारागृहातील सर्व बंदीजनांना मार्गदर्शन आणि विधी सेवेचे महत्व इत्यादीची माहिती देण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात उपस्थित कैद्यांना त्यांचे हक्क आणि अधिकार याबाबत मार्गदर्शन करण्यात आले तसंच “हक्क हमारा भी तो है” या अभियानाचे महत्व विषद करण्यात आले. या मोहिमे अंतर्गत सर्व न्यायालयीन बंदी आणि शिक्षाधीन बंदी यांची प्रत्यक्ष मुलाखत घेण्यात येणार असून त्याद्वारे त्यांची सर्व माहिती , त्यांच्या कायदेशीर अडचणी, वकील नेमणूक, वैद्यकीय मदत, कुटुंब मुलाखत या सर्व बाबींची माहिती संकलीत करण्यात येणार आहे. त्याआधारे या अडचणी सोडवणे हा या अभियानाचा उद्देश आहे. या अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी 10 विधीज्ञ, 11 विधी स्वयंसेवकांची समिती गठित करण्यात आली असून समितीमार्फत पहिल्याच दिवशी 500 बंदीजनांची प्रत्यक्ष मुलाखत घेण्यात आली आहे. उर्वरीत बंदीजनांची मुलाखत नियोजित वेळापत्रकानुसार घेण्यात येणार असल्याची माहिती ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव ईश्वर सुर्यवंशी यांनी यावेळी दिली.