कवितेची परंपरा समृध्द करण्यासाठी पुढच्या पिढीनं अधिकाधिक वाचन केलं पाहिजे तसंच मराठी साहित्यातील महत्वाचे कवी यांचं अध्ययन केलं पाहिजे असे विचार ज्येष्ठ कवी ना. धो. महानोर यांनी व्यक्त केले. विद्या प्रसारक मंडळाच्या वतीनं आयोजित डॉ. वा. ना. बेडेकर स्मृती व्याख्यानमालेचे २६वं पुष्प गुंफताना ना. धो. महानोर यांनी हे विचार व्यक्त केले. या व्याख्यानमालेत आत्तापर्यंत दीपक टिळक, निलिमा मिश्रा, भरत पटवानी, डॉ. वामन केंद्रे, डॉ. प्रकाश आणि मंदाकिनी आमटे अशा अनेक मान्यवरांनी आपले विचार मांडले आहेत. वारकरी संत परंपरा, लोकसंगीत, ओव्या, भजन, भारूड, किर्तनं इत्यादी लोकपरंपरांमधून आपला कवितेचा पिंड जोपासत गेला असं त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी पु. ल. देशपांडे, लता मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर, व्ही. शांताराम, श्याम बेनेगल यांच्यासोबत केलेल्या कामाचे आणि त्यांच्या कवितांचे प्रवासातले अनुभव सांगितले. त्यांनी त्यांचा काव्यप्रवास यावेळी विविध अनुभव कथन करत उपस्थितांसमोर उलगडून दाखवला. शेती इतकं पवित्र आणि समृध्द असं काही नाही फक्त पाणी हवं अशी खंत त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. या कार्यक्रमास मंडळाचे पदाधिकारी, विद्यार्थी, प्राध्यापक वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता.