कळवा-मुंब्रा-शीळ परिसरात टोरंट पॉवर कंपनीने वीज चोरांविरूधद् जोरदार मोहीम सुरू केल्यापासून या परिसरात होत असलेल्या वीज चोरीच्या प्रकारात गेल्या २ वर्षात घट झाल्याचे दिसून आले आहे. नवीन मीटर लावणे, कायम स्वरूपी मीटर बंद झालेल्या पीडी ग्राहकांसाठी विलासराव देशमुख अभय योजना सारख्या योजनांची सुरूवात या परिसरात करूनही अदयापही १५ हजारावर घरे मीटरशिवाय बेकायदेशीरपणे वीज वापरत असल्याचे निदर्शनास आले आहे. कळवा-मुंब्रा-शीळ परिसरात सव्वा तीन लाखावर वीज ग्राहक असून मार्च २०२० साली जेव्हा टोरंट पॉवरने फ्रँचाईझी म्हणून याभागाचा कारभार हाती घेतला तेव्हा या क्षेत्रातील वीज गळती आणि नुकसानीचे प्रमाण ५० टक्केपेक्षा जास्त होते. टोरंट कंपनीने केलेल्या उपायांमुळे गळती थोडी कमी झाली असली तरी, अजुनी काही प्रमाणात राहिलेली आहे. नवीन उच्च दाबाच्या वीज वाहिन्यांचे जाळे परिसरात पसरवले. ग्राहकांना वीज वापराची अचूक नोंद दाखवणारे नवीन मीटर बसवण्यात आले. नवीन रोहीत्र, आरएमयु बसवण्यात आले. यामुळे ग्राहकाना अखंडीत वीज पुरवठा होऊ लागला. असे असतानाही काही ग्राहक अद्यापही वीज बेकायदेशीररीत्या मीटर न लावता वापरत असल्याचे आढळून आले आहे. असे करणे म्हणजे वीज चोरी असून हा कायद्याने गुन्हा आहे. वीज कायदा अंतर्गत वीज चोरीबद्दल कायदेशीर कारवाई होऊन दंड आणि अटक देखील होते. गैरकायदेशीर वापरामुळे नियमित वीज बिल भऱणा करीत असलेल्या ग्राहकांवर अन्याय होत आहे.