कल्याण शहराचे प्रवेशद्वार असलेल्या विठ्ठलवाडीतून जाणाऱ्या जुन्या पुणे लिंक रस्त्यावरून कल्याण शहराच्या पश्चिमेला कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर जाण्यासाठी कल्याण किंवा उल्हासनगर शहराचा मोठा वळसा घालून जावे लागते. हा वळसा येत्या काही दिवसात थांबणार असून जुन्या पुणे लिंक रस्त्यावरून थेट कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर जाण्यासाठी उन्नत मार्गाची उभारणी केली जाणार आहे. त्यामुळे सुमारे ४० मिनिटांचा प्रवास वेळ पाच मिनिटांवर येणार आहे. लवकरच या कामाची निविदा जाहीर केली जाणार असून खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश आले आहे. सध्याच्या घडीला कल्याण पूर्वेतील विठ्ठलवाडी परिसर आणि कल्याण पश्चिम भागात येणारा हा परिसर तसा भौगोलिकदृष्ट्या दूर नाही. मात्र या वालधुनी, विठ्ठलवाडी परिसरातून प्रवास करत शहाड भागात जाणे तितकेसे सोपे नाही. त्यासाठी थेट मार्ग तर मुळीच नाही. त्यामुळे एकाच शहराची दोन टोके दूर असल्यासारखे वाटतात. जुना कल्याण पुणे लिंक रस्ता या नावाने ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठलवाडी परिसरातून शहाड परिसरात जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. मात्र आता ही कसरत बंद होणार आहे. विठ्ठलवाडी भागातून थेट कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गाला जोडण्यासाठी नव्या उड्डाणपुलाची निर्मिती केली जात आहे. कमीत कमी भूसंपादन करत अथडळे टाळत हा मार्ग उभारण्याची संकल्पना खासदार श्रीकांत शिंदे यांनी मांडली होती. त्यामुळे कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरून थेट कल्याण पूर्व, विठ्ठलवाडी आणि उल्हासनगरच्या पूर्व भागात पोहोचणे सोप होणार आहे. त्यामुळे कल्याण आणि आसपासच्या परिसरातील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल.