कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील भाल या गावी क्षेपण भूमीचं आरक्षण टाकण्यात आल्यामुळं गावात मोकळी जागाच राहत नसून याप्रकरणी भालच्या ग्रामस्थांना दिलासा देणारा निर्णय घेऊ अशी ग्वाही नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. ५२३ एकर परिसरात वसलेल्या भाल या गावी केंद्र आणि राज्य सरकारची मिळून विविध प्रकारची आरक्षणं असून या आरक्षणात ५०० एकर जमीन बाधित होत आहे. क्षेपण भूमी अडीचशे, विमानतळासाठी १३९, वन विभाग २५, गुरचरण जमीन १४ एकर अशा विविध प्रकारच्या आरक्षणामुळे गावातील ५२३ एकरपैकी ४९९ एकर जमीन बाधित होत असल्यामुळं ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. यासंदर्भात मंत्रालयात झालेल्या बैठकीत विकेंद्रीत पध्दतीनं घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारणं आवश्यक असून अख्खे गाव बाधित होत असेल तर तो ग्रामस्थांवर अन्याय होईल असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. निसर्गरम्य असं हे गाव असून गावात ८ एकर वर पसरलेला तलाव आहे. त्यामुळं ग्रामस्थांना दिलासा देणारा निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.