योग हा मन आणि शरीर सुदृढ करण्याचा मार्ग आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात योगाच्या माध्यमातून आपले आरोग्य सुदृढ ठेवावे, असे प्रतिपादन केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी कल्याण येथे केले.आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय पंचायती राज मंत्रालय आणि ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीने कल्याणमधील फडके मैदानात केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पाटील, जिंदल यांच्यासह उपस्थितांनी योग प्रात्यक्षिके केली. विविध शाळांचे विद्यार्थीही मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. मोठ्या संख्येने नागरिक, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी योग प्रात्यक्षिकेमध्ये सहभागी झाले होते. डॉ. संध्या यांनी उपस्थितांकडून योगाची प्रात्यक्षिके करून घेतली. यावेळी विविध संस्थानी देखिल सहभाग नोंदविला. शालेय विद्यार्थ्यांनी केलेल्या स्वरचित कविता ‘क क कवितेचा’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा देऊन केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील म्हणाले की, आज वर्षातील सगळ्यात मोठा दिवस आहे. या मोठ्या दिवसा प्रमाणेच योगाच्या माध्यमातून आपले जीवन सुद्धा मोठे करावे. पाच हजार वर्षापासून योग हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे. योगाला आंतरराष्ट्रीय पातळीवर खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणात ओळख देण्याचे काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले आहे.