दिवाळीनंतर ग्रामीण भागात पार पडणाऱ्या तुळशी विवाहाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. कल्याणच्या काटई परिसरात असाच एक भव्य तुळशी विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्याला शिवसेना खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी आवर्जून हजेरी लावत वधु वरावर अक्षदा टाकल्या. या विवाह सोहळ्याला हजारोंच्या संख्येने वऱ्हाडी मंडळी उपस्थित होती. विशेष म्हणजे ज्याप्रमाणे खरा खुरा विवाह सोहळा पार पडतो, तशाच प्रकारची थाटमाट या विवाह सोहळ्यात होता. भव्य मंडप,आसन व्यवस्था, जेवणावर तसेच वाजंत्री फटाक्यांची आतषीबाजी असं भव्य आयोजन या विवाह सोहळ्याला करण्यात आले होते. इतकच काय तर अंतरपाठ धरून मंगलाष्टकांनी अतिशय विधिवत हा विवाह सोहळा संपन्न झाला. गेल्या १८ वर्षापासून अशाच पद्धतीने हा विवाह सोहळा दरवर्षी पार पडतो. पंचक्रोशीतील हजारोंच्या संख्येने वऱ्हाडी मंडळी या आगळ्यावेगळ्या विवाह सोहळ्याला उपस्थिती लावतात.