बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रातही ओबीसींची जातगणना करण्यात यावी, या मागणीसाठी जिल्हाधिकार्यांच्या मार्फत सुमारे 2 हजार ओबीसी नागरिकांनी राज्य सरकारला पत्रे धाडली आहेत. विशेष म्हणजे, 45 ज्ञाती संघटनांकडूनही निवेदने पाठविण्यात आली असून लवकरात लवकर ही जनगणना सुरु केली नाही. तर, ठाणे ओबीसी एकीकरण समितीच्या माध्यमातून राज्यभर ओबीसींमध्ये जनजागृती करुन रस्त्यावरची लढाई लढण्यात येईल, असा इशारा प्रफुल वाघोले, अशोक विशे, मंगेश आवळे आदींनी दिला आहे. महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना करावी, अशी मागणी ओबीसी समाजामधून होत आहे. या मागणीसाठी ठाणे ओबीसी एकीकरण समितीच्या माध्यमातून विविध जातीनिहाय संघटना, सामाजिक संघटनांनी ओबीसी जनजागृती अभियानास सुरुवात केली आहे. या अभियानामुळेच जिल्ह्यातून सुमारे 2 हजार नागरिकांनी आणि आंबेडकरी, चर्मकार, कुणबी, माळी, साळी, कोळी, तेली आदी जातींच्या सुमारे 45 संघटनांनी राज्यसरकारला निवेदने दिली आहेत. महाराष्ट्र शासनाने बिहार सरकारप्रमाणे जातनिहाय जनगणना करावी असा ठराव विधानसभेत मंजूर केला होता. त्याचीच अंमलबजावणी शिंदे- फडणवीस सरकारने त्वरीत करावी; अन्यथा, ठाणे ओबीसी एकीकरण समितीच्या माध्यमातून राज्यभर ओबीसींमध्ये जनजागृती करुन रस्त्यावरची लढाई लढण्यात येईल, असा इशारा ओबीसी एकीकरण समितीने दिला आहे.