महाविद्यालयीन जीवनात सर्वात धोकादायक असेल तर तो मोबाइल. मोबाइल वरुन चालू होणाऱ्या ऑनलाइन मैत्री, ऑनलाइन प्रेम या गोष्टी मुलांसाठी अत्यंत घातक आहेत. मोबाइलचा उपयोग फक्त आणि फक्त कामासाठी करावा. करमणुकीसाठी खेळ, वाचन, नाट्य आणि इतर कलांचा मार्ग चोखावा, असे कळकळीचे आवाहन जोशी बेडेकर कॉलेजच्या प्राचार्या सुचित्रा नाईक यांनी केले. समता विचार प्रसारक संस्थेने आयोजित केलेल्या एकलव्य गौरव पुरस्काराच्या पाठपुरावा कार्यक्रमात त्या कॉलेजची दुनिया या विषयावरील सत्रात बोलत होत्या. आत्ताच १० वी उत्तीर्ण होऊन कॉलेज मध्ये प्रवेश घेणाऱ्या एकलव्यांना मार्गदर्शन करताना त्या पुढे म्हणाल्या,आई वडिलांनी आपल्या शिक्षणासाठी किती कष्ट केलेत हे लक्षात ठेवावं आणि कॉलेज मध्ये आपण मुख्यत्वे अभ्यास करायला येतो हे विसरू नये. पुढची पाच वर्ष ही तुमच्या आयुष्याच्या पुढील वाटचाळीसाठी खूप महत्वाची आहेत. ती तुम्ही तुमच्या सर्वांगीण प्रगतीसाठी वापरा. अन्य मोहांना बळी पडू नका असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमात २५ एकलव्यांना गौरव पुरस्कार देण्यात आले.