वेधशाळेच्या अंदाजानंतर रेल्वेनं बदललेल्या वेळापत्रकामुळं उपनगरीय गाड्यांत झालेल्या गर्दीनं चार प्रवासी गाडीतून पडून जखमी झाले. वेधशाळेनं ३ जुलैला अतिवृष्टीचा इशारा दिला होता. यामुळं रेल्वे प्रशासनानं रविवारच्या वेळापत्रकानुसार उपनगरीय गाड्या काल चालवण्याचा प्रयत्न केला. यामुळं उपनगरीय गाडीच्या जवळपास ३०० फे-या कमी झाल्या होत्या. एवढ्या मोठ्या संख्येनं गाड्यांच्या फे-या कमी झाल्यानं ठाणे ते कल्याण पर्यंत सकाळच्या वेळी प्रवाशांची तोबा गर्दी उसळली होती. गाड्यांची संख्या कमी असल्यामुळं गाड्यांमध्ये प्रवाशांना उभं रहायलाही जागा नव्हती. अनेक प्रवासी दरवाजाला लटकत प्रवास करत होते. अशांपैकी चालत्या उपनगरीय गाडीमधून पडून ४ प्रवासी जखमी झाले. यामध्ये एका महिलेचाही समावेश होता. जीव मुठीत धरून प्रवास करणारे हे प्रवासी कळवा-मुंब्रा दरम्यान चालत्या गाडीतून पडले. नाजमीन शेख, नाझीर शेख, निखिलेश कुबल हे प्रवासी गाडीतून पडले होते. या सर्वांना उपचार केल्यानंतर सोडून देण्यात आलं.