जिल्ह्यामध्ये झपाट्याने औद्योगिकीकरण होत असताना जिल्हा परिषदेनं अवजारे बँक ही नाविन्यपूर्ण योजना राबवून औद्योगिकरणाचा पूरक उपयोग शेतीसाठी केल्याचं प्रतिपादन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केलं. शहापूर तालुक्यातील विही गावात जिल्हा परिषद कृषी विभाग आणि महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीनं यंत्राद्वारे पीक कापणीचं प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आलं होतं. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. जिल्हा परिषद कृषी विभाग सेस फंडातून ही योजना राबवली जात आहे. गेल्या ३ वर्षापासून शेतक-यांसाठी अवजारे बँक ही योजना वरदान ठरली आहे. या योजनेमुळं यांत्रिक पध्दतीनं शेतीची कामं करणं सोपं झालं आहे. जिल्ह्यातील महिला बचत गटांना या योजनेचा लाभ देण्यात येत असल्याचं कृषी अधिकारी डॉ. प्रफुल्ल बनसोडे यांनी सांगितलं.