अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांच्या हस्ते ठाण्याच्या राजपत्रित अधिका-यांच्या महासंघाच्या पदाधिका-यांचा गौरव करण्यात आला. ठाणे जिल्हा समन्वय समितीचे अध्यक्ष उपजिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील आणि इतर पदाधिका-यांनी मंत्रीमहोदयांच्या हस्ते मानचिन्ह स्वीकारले. महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचा ३३वा वर्धापन दिन मंत्रालयात झाला त्यावेळी हा गौरव करण्यात आला. जिल्हा समन्वय समितीच्या पदाधिका-यांमध्ये उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही, सहाय्यक राज्य कर आयुक्त बाळकृष्ण क्षीरसागर, निवासी वैद्यकीय अधिकारी अविनाश भागवत, जिल्हा परिषद अभियंता संघटनेचे मोहन पवार आदींची उपस्थिती होती. आश्वासित प्रगती योजनेत बाधा ठरणारी ५ हजार ४०० च्या ग्रेड पे ची बाधा दूर करून सर्वांना १०, २० आणि ३० या तीन टप्प्यांचा लाभ देण्यात यावा, अधिका-यांच्या पाल्यांना अनुकंपा तत्वावर नोकरी देताना प्रकल्पग्रस्तांच्या यादीतून स्वतंत्र करून ती दिली जावी, वेतन त्रुटी समितीचा अहवाल १५ फेब्रुवारीच्या आत शासनाकडे सादर होईल याची काळजी घ्यावी, रिक्त पदांची दरी कमी करावी, कंत्राटी पध्दतीनं होणारी कर्मचा-यांची भरती थांबवावी, ५ दिवसांचा आठवडा करावा, सेवानिवृत्तीचे वय ६० करावं असे प्रश्न सोडवण्यासाठी अर्थमंत्र्यांनी महासंघाचं नेतृत्व स्वीकारून हे प्रश्न मुख्यमंत्र्यांसमोर मांडावेत अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.