अनोळखी व्यक्तींकडून मोबाईलवर संपर्क करून फसवणूकीचे प्रकार घडत असून अशा सायबर गुन्ह्यांचं प्रमाण वाढलं आहे. याबाबत सावधगिरी बाळगण्याचं आवाहन कोपरी पोलीसांनी केलं आहे. अनोळखी व्यक्ती मोबाईल संपर्क करून फसवणूक होण्याच्या प्रकारात दिवसेंदिवस वाढ होत आहे. इलेक्ट्रीक बील न भरल्यास लाईटचं कनेक्शन कापण्यात येईल, आयकर विभागातून बोलतो आहे किंवा फर्निचर अथवा किंमती वस्तू स्वस्तात विकत असल्याची बतावणी करून फसवणूक केली जाते. तसंच कर्जाचं आमिष दाखवून तसंच महिलांना ब्लॅकमेल करण्याच्या हेतूने घाबरवून फसवणूक केली जाते. तर अशा अनोळखी व्यक्तींकडून दाखवल्या जाणा-या आमिषाला बळी न पडण्याचं आवाहन कोपरी पोलीसांनी केलं आहे. बँकेतून बोलत असल्याचं सांगून ओटीपी मागण्याचा प्रयत्न करून निरपराध व्यक्तींना लुबाडून अपहार होण्याच्या प्रकारात वाढ होत असल्याचं पोलीसांनी प्रसिध्द केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. त्यामुळे नागरिकांनी अनोळखी व्यक्तींशी बोलणं टाळावं, बँक खात्याची गोपनीय माहिती देऊ नये, अनोळखी व्यक्तींनी पाठवलेल्या लिंक ओपन करू नये असं आवाहन पोलीसांकडून करण्यात आलं आहे.