अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या शेतकरी मोर्चाचे ठाण्यातही जोरदार स्वागत झाले. ठाण्यामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि शेतकरी कामगार पक्ष यांच्यातर्फे हे स्वागत करण्यात आले. अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली राज्यातील २१ जिल्ह्यातील १५ हजारहून अधिक शेतक-यांनी काल इगतपुरीतून या मोर्चाला सुरूवात केली. कसा-याजवळ मोर्चा आल्यानंतर मोर्चेक-यांनी गाडीत बसून आगेकूच सुरू केली. कल्याण फाट्याजवळ या शेतक-यांचं स्वागत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष तसंच इतर संघटनांनी केलं. यावेळी गुरूद्वारा मार्फत शेतक-यांना जेवणाची पाकिटं देण्यात आली. पुढे ठाण्यातही या शेतक-यांचं असंच स्वागत करण्यात आलं. आता हा मोर्चा मुंबईत पोहचला आहे. कृषी कायदे आणि चारही श्रमसंहिता रद्द कराव्यात, वीज विधेयक मागे घ्यावं आणि शेतक-यांसाठी रास्त हमीभावाचा कायदा करावा अशा मोर्चेक-यांच्या मागण्या आहेत.