ठाणे, कल्याण आणि वसई या पहिल्या टप्प्यातील जलवाहतुकीची सुरूवात करण्यासाठी तातडीनं कार्यवाही करावी अशी मागणी खासदार शिंदे यांनी लोकसभेत केली आहे. ठाणे, कल्याण, वसई दरम्यानच्या ५० किलोमीटरची अंतर्गत जलवाहतूक सुरू करण्यास अक्षम्य दिरंगाई होत असल्याचा आरोप श्रीकांत शिंदे यांनी लोकसभेतील चर्चेदरम्यान केला. तत्कालीन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जलवाहतुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी साडेसहाशे कोटी रूपये मंजूर केले होते. पण लोकसभा निवडणुका आल्यामुळे भूमीपूजन होऊ शकलं नाही. नवीन शासन आसनस्थ झाल्यावर केंद्रीय मंत्री मनसुखलाल मदविया यांची घेतली. त्यांनी जून महिन्यात तरतूद केली जाईल असं सांगितलं आणि तीन महिन्याच्या आत काम सुरू करण्याचे आदेशही दिले. वसई, ठाणे, कल्याण हा पहिला टप्पा तर ठाणे, नवी मुंबई हा दुसरा टप्पा होता. याचा विकास प्रकल्प अहवाल ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये प्रकाशित होणं अपेक्षित होतं पण अजून पहिल्या टप्प्याचंच काम झालं नसल्यानं रस्ते आणि रेल्वे मार्गाची कोंडी वाढत असल्यानं याबाबत तातडीनं काम सुरू करण्याची मागणी खासदार श्रीकांत शिंदे यांनी लोकसभेत केली.