राज्यातील स्थगिती सरकारचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी अर्बन फॉरेस्ट आणि विज्ञान केंद्राच्या केलेल्या भूमीपूजनाला त्यांचीच सत्ता असलेल्या महापालिकेनं स्थगिती दिल्याची टीका आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे. राज्यामध्ये पूर्वीच्या सरकारनं केलेल्या अनेक कामांना मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली. त्याच मुख्यमंत्र्यांनी भूमीपूजन केलेल्या आणि महापालिकेत त्यांचीच सत्ता असलेल्या महापौरांनी स्थगिती दिली असून आता भूमीपूजनाचा फलक शिवसेना काढणार का असा प्रश्नही आमदार डावखरे यांनी उपस्थित केला आहे. पक्ष प्रमुखांना बोलावण्याआधी शिवसेनेच्या नेत्यांनी आपली भूमिका निश्चित करायला हवी होती असंही डावखरे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर झोपडपट्टीवासियांना ५०० चौरस फूटाचं घर त्याचप्रमाणे महापालिका निवडणुकीत ५०० चौरस फूटापर्यंतच्या घरांना मालमत्ता करात माफी देण्याची घोषणा करण्यात आली होती. पण या घोषणांचं काय झालं असा सवालही डावखरे यांनी उपस्थित केला आहे. समूह विकास योजनेतून गावठाण आणि कोळीवाड्यांना वगळल्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी केली होती. पण हजुरी गावठाणाचा प्रकल्पात समावेश करण्यात आल्याचा आरोप आमदार निरंजन डावखरे यांनी केला आहे.