रिक्षा संघटनांच्या प्रलंबित मागण्यांवर योग्य निर्णय न झाल्यास कोकणातील रिक्षा चालकांनी १ ऑगस्टपासून बेमुदत बंदचा इशारा दिला आहे. काल एका पत्रकार परिषदेत कोकण रिक्षा-टॅक्सी महासंघाने हा इशारा दिला आहे. इंधनाच्या दरवाढीमुळे रिक्षा भाडेवाढ त्वरीत मिळावी, मागेल त्याला परवान्यांना स्थगिती द्यावी, ई-चलनाद्वारे होणारी दंडेली बंद करावी अशा विविध मागण्यांसंदर्भात परिवहन विभागाच्या अधिका-यांनी ३० जुलैपर्यंत योग्य निर्णय न घेतल्यास कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रिक्षा चालकांनी बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. गेल्या दोन वर्षात सीएनजी गॅसच्या दरामध्ये किलोमागे २८ रूपयांनी वाढ झाली आहे. तरी भाडेवाढ झालेली नाही. त्याचप्रमाणे इतरही अनेक मागण्या प्रलंबित असून यावर अद्याप ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळं प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यास १ ऑगस्ट पासून बेमुदत संपाचा इशारा कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघानं दिला आहे.