मराठी भाषेचं जतन आणि संवर्धन करणं ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी असून मराठी भाषेचा आग्रह धरणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन वैदेही रानडे यांनी केलं. ज्येष्ठ कवी वि वा शिरवाडकर यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरवदिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचं औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. भाषा हे केवळ आपल्या बोलण्याचं माध्यम नसून भाषा हे आपल्या ज्ञानग्रहणाचंही माध्यम आहे. दैनंदिन वापरात जी भाषा वापरतो तिच्याविषयी आपल्या मनात आदर असणं आवश्यक आहे. ज्ञान मिळवण्यासाठी प्रत्येक भाषा आवश्यक आहे. इंग्रजी माध्यमाचा आग्रह धरताना मराठी भाषेकडे दुर्लक्ष करता कामा नये असंही वैदेही रानडे यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी मराठी भाषेशी निष्ठा राखण्याची शपथ उपस्थितांना दिली.