केंद्रीय निवडणूक आयोगानं १ जानेवारी २०२० या अर्हता दिनांकावर मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. या कार्यक्रमांतर्गत २८ फेब्रुवारी ते २७ मार्च पर्यंत जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांमध्ये दावे आणि हरकती स्वीकारल्या जाणार आहेत. या कार्यक्रमांतर्गत ५ मे २०२० रोजी अंतिम मतदारयादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. ७ आणि ८ मार्च तसंच १४ आणि १५ मार्च या दिवशी जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक मतदान केंद्रांवर विशेष मतदार नोंदणी मोहिम आयोजित करण्यात येणार आहे. या मतदान केंद्राच्या ठिकाणी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी नागरिकांकडून नाव नोंदणी अर्ज स्वीकारण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील सर्व मतदारांनी विशेषत: १८ ते २१ वयोगटातील तरूण तरूणींनी ज्यांच्या वयाची १८ वर्ष १ जानेवारीला पूर्ण होत आहेत त्यांनी आपलं नाव मतदार यादीमध्ये नोंदणी करावं असं आवाहन जिल्हा निवडणूक अधिका-यांनी केलं आहे.