ठाणे आणि आजूबाजूच्या परिसराला पाणी पुरवठा करणा-या भातसा धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. सुरूवातीला शहरात पाऊस होत असताना धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मात्र म्हणावा तसा पाऊस नव्हता. त्यामुळं पाणी टंचाईची टांगती तलवार होती. पण गेल्या काही दिवसात धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पावसानं चांगली हजेरी लावली आहे. बारवी धरणातील पाणी साठा जवळपास ९१ टक्के झाला आहे. तर भातसा धरणात ८८ टक्के पाणी साठा आहे. सध्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसानं विश्रांती घेतली आहे. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून धरणाचे दोन दरवाजे खुले करण्यात आले आहेत.