बीडीडी चाळीतील ज्या खोल्यांमध्ये राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जातीय द्वेष आणि विषमतेविरोधात लढा उभारला त्या दोन खोल्यांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं राष्ट्रीय स्मारक उभारण्याचा निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जाहीर केला आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी या दोन खोल्यांना भेट दिली त्यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्मारक उभारण्याची घोषणा केली. १९१२ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वडीलांना बीडीडी चाळीतील क्रमांक १ मधील दोन खोल्या मिळाल्या होत्या. डॉ. बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यातील २२ वर्ष या चाळीत काढली. या खोल्या राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित कराव्या अशी मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली होती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या खोलीच्या इतिहासाची माहिती दिली होती. उध्दव ठाकरे यांनी ५ डिसेंबरच्या रात्री आमदार आव्हाड यांना बीडीडी चाळीमध्ये राष्ट्रीय स्मारक उभारत असल्याची माहिती दिली. त्यानुसार चैत्यभूमीतील अभिवादनानंतर उध्दव ठाकरे यांनी या खोल्यांना भेट दिली आणि राष्ट्रीय स्मारक करत असल्याची घोषणा केली.