ठाणे स्मार्ट सिटीच्या वतीनं शाश्वत विकास ध्येयावर आधारीत एका कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. नागरिकांच्या सहभागाला प्राधान्य देऊन कोणते नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जावेत याचा अभ्यास करण्यासाठी या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. शाश्वत विकासाच्या दृष्टीनं अधिकारी आणि कर्मचा-यांकडून विविध संकल्पना यावेळी जाणून घेण्यात आल्या. शाश्वत विकासाचा भाग म्हणून गेल्या काही वर्षामध्ये ठाणे महापालिका आणि स्मार्ट सिटीच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवण्यात आले आहेत. यामध्ये आरोग्य, गरिबी, रोजगार, शिक्षण, पर्यावरण, खाडीकिनारा संवर्धन अशा सर्वच क्षेत्रात ठाणे स्मार्ट सिटीनं कोणते उपक्रम राबवून नागरिकांचा सहभाग वाढवला आहे याची संपूर्ण माहिती यावेळी स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर उन्हाळे यांनी दिली. दारिद्र्य निर्मूलन, भूक निर्मूलन, चांगले आरोग्य, दर्जेदार शिक्षण, लैंगिक समानता, शुध्द पाणी, स्वच्छता, नुतनीकरण करण्याजोगी आणि स्वस्त उर्जा, चांगल्या नोक-या, नवीन उपक्रम, पायाभूत सुविधा, असमानता कमी करणे, शाश्वत शहरे, उपलब्ध साधनांचा जबाबदारीपूर्वक वापर, हवामानाचा परिणाम, जमिनीचा शाश्वत उपयोग अशी १७ ध्येयं युनायटेड नेशन्सनी बनवली आहेत. या ध्येयाचा विचार करता महापालिकेच्या माध्यमातून कोणते उपक्रम राबवण्यात येतील याचा अभ्यास करण्यासाठी या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. या उपक्रमामध्ये शालेय विद्यार्थ्यांपासून गृहनिर्माण सहकारी सोसायटी पर्यंत समाजातील सर्व घटकांना शाश्वत विकासाच्या प्रक्रियेमध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न करणं, पायाभूत विकासाबरोबरच आनंदी शहराची संकल्पना प्रत्यक्षात उतरावी यासाठी कोणते प्रकल्प राबवले जावेत याबाबत या कार्यशाळेत माहिती देण्यात आली.