ठाणे जिल्ह्यातील १६ लाख गरजू नागरिकांची प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत नोंदणी झाली असून लवकरच ही यादी केंद्र शासनाकडून जिल्हा प्रशासनाला प्राप्त होणार आहे. यानुसार या लाभार्थ्यांना ‘ आयुष्मान कार्डचे वितरण होणार असून वर्षभरात पाच लाखांपर्यंत वैद्यकीय उपचाराचा लाभ त्यांना घेता येईल, अशी माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली. जिल्ह्यात १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत ‘आयुष्मान भव’ मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेची अंमलबजावणी करताना सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवा, अशी सूचना जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केली. विशेष मोहिमेंतर्गत आयुष्मान आपल्या दारी ३.०, आयुष्मान सभा, आयुष्मान मेळावा आणि अंगणवाडी आणि प्राथमिक शाळांमधील मुलांची तपासणी करण्यात येणार आहे. आरोग्यविषयक उपक्रम, मोहिमा राबविताना सर्वसामान्याच्या आरोग्यविषयक समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य देण्याची गरज असल्याचे जिल्हाधिकारी या वेळी म्हणाले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी यावेळी मोहिमेचे सादरीकरण करताना, १ हजार ३६५ आजारांचा समावेश यात करण्यात आल्याचे सांगितले.