एकी कडे काही ना काही कारणानं दर आठवड्याला पाणी कपात होत असताना दुसरी कडे मात्र गेले सहा महीने ठाण्यात रोज लाखो लीटर्स पाणी वाया जात आहे. जिल्ह्यातून मुंबईला पाणीपुरवठा करणारे पाणी जल बोगद्याद्वारे भांडुप येथील जल शुद्धीकरण प्रकल्पात नेले जाते मात्र याच जलशुद्धीकरणासाठी पाणी वाहून नेण्यात येणाऱ्या भूमिगत जल बोगद्याला शहरातील किसन नगर भागात बोअरवेल साठीचे खोदकाम करताना नोव्हेंबर महिन्यात हानी झाली आहे. गेल्या पाच महिन्यांपासून या ठिकाणी दररोज अंदाजे पाच ते सहा दशलक्ष लिटर पाणी वाया जात आहे. वाया जाणारे पाणी निदर्शनास येऊ नये म्हणुन सक्शन पंप द्वारे गटारात आणि नाल्यात सोडले आहे. वास्तविक बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जल विभागाने जलबोगद्याच्या दुरुस्तीचे काम आतापर्यंत पूर्ण करावयास हवे होते. परंतु पाच महिने होऊन देखील परिस्थिती जैसे थे आहे ही बाब काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी पत्राद्वारे जल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. मुख्य भूमिगत जल बोगदा जर कोणत्याही प्रकारे काम करताना फुटला तर संबंधित कंपनी अथवा प्राधिकरणाला दुरुस्तीचा खर्च,पर्यायी व्यवस्थेचा खर्च, वाहून गेलेल्या पाण्याच्या किंमतीचा खर्च या दोघांची एकूण रक्कम अधिक 400 टक्के दंड आकारला जातो. परंतु या ठिकाणी कुठलीही परवानगी नसताना बोअरिंग साठी खोदकाम करत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भूमिगत जल बोगद्याला हानी पोहोचविल्याबद्दल संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता. परंतु चार महिने उलटूनही अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. या प्रकरणात बडे व्यवसायिक गुंतल्या मुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे प्रशासन त्यांना पाठीशी तर घालत नाही ना असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.