समाजातील अधिकांश लोक चांगले काम करण्यास उत्सुक असतात. कोरोना संसर्गाच्या सव्वा वर्षाच्या काळात शासकीय अधिकारी, कर्मचारी, अशासकीय संस्था आणि एकूणच समाजातील सर्व लोकांनी कर्तव्यापलीकडे जाऊन सेवाकार्य केल्यामुळे समाजातील नकारात्मक चित्र बदलले. कोरोना हे जसे आव्हान होते तसेच ती एक सेवेची संधी ठरली, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालय आणि महापालिका यांच्या अंतर्गत कोविड टास्क फोर्सच्या माध्यामातून कोरोना काळात कार्य करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राज्यपालांच्या हस्ते ‘ठाणे सिटिझन्स प्राईड’ पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका कायम असून सर्व कोरोना योद्ध्यांनी यानंतर जनतेमध्ये जाऊन मास्क वापर, सुरक्षित अंतर राखणे आदी कोरोना विषयक सावध आचरणाबाबत जनजागृती करावी असे आवाहन राज्यपालांनी केले. राज्यपालांच्या हस्ते यावेळी पोलीस महासंचालक विवेक फणसळकर, ठाण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी वैदही रानडे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ शिवाजी पाटील, उपजिल्हाधिकारी रेवती गायकर, परिचारिका वर्षा दळवी, सारिका ढोकले, ठाणे पोलीस दलातील जहांगीर चोहारी, वॉर्डबॉय विक्की धाकोलिया, ठाणे महानगरपालिकेच्या कोविड टास्क फोर्स टीमच्या वैद्यकिय अधिकारी वैजयंती देवगेकर, ठाणे अग्निशामक दलाचे निलेश वेताळ आदींना ठाणे सिटीझन्स प्राईज ॲवार्ड २०२१ ने सन्मानित करण्यात आले.