जग डिजिटल ५जी च्या जगात पुढे जात असताना शालेय विद्यार्थ्यांनी चक्क कवितेचे स्वरचित पुस्तक प्रकाशन करणं म्हणजे साहित्य क्षेत्रात चिमुकल्यांनी भर पाडण्याचे मोलाचे काम केलं आहे. जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत पंचायत समिती कल्याण येथिल शिक्षण विभागाच्या नाविन्यपूर्ण प्रकल्पातून विद्यार्थ्यांनी ‘क क कवितेचा’ हे पुस्तक नावा रुपास आणले. या कविता पुस्तकाचे प्रकाशन केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते झाले. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमांत पुस्तक प्रकाशन झाल्यानंतर कपिल पाटील यांनी शालेय विद्यार्थ्यांसोबत बातचीत करत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. पंचायत समिती कल्याण मधील शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांकडून उत्कृष्ट कविता लिहून घेतल्या. पुस्तक छापुन आणण्यास पुढाकार घेतला आहे. नाविन्यपूर्ण संकल्पना उदयास आणण्यासाठी शिक्षणाधिकारी प्राथमिक डॉ. भाऊसाहेब कारेकर, शिक्षणाधिकारी माध्यमिक ललिता दहितुले, गटविकास अधिकारी कल्याण अशोक भवारी, गट शिक्षण अधिकारी कल्याण रुपाली खोमणे तसेच शिक्षकांनी विशेष प्रयत्न केले आहेत. शालेय विद्यार्थ्यांनी केलेल्या स्वरचित कविता ‘क क कवितेचा’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. शालेय विद्यार्थी कविता लिहित आहेत आणि कवितेच्या माध्यमातुन मत मांडत आहेत ही कौतुकास्पद बाब असल्याचं मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांनी सांगितलं.