प्रस्तावित कल्याण-मुरबाड रेल्वेसाठी राज्य शासनाचा 50 टक्के वाटा लवकरच केंद्र शासनाला उपलब्ध करून दिला जाईल, यामुळे मुरबाडकरांचे स्वप्न पूर्ण होईल. 26 आणि 27 जुलै रोजी झालेल्या
बदलापूर-कल्याण परिसरातील पुरपरिस्थितीमुळे घरात पाणी शिरल्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून राज्य शासन नुकसानग्रस्तांना भरीव मदत करेल आणि गरज भासल्यास नव्या
निकषानुसार शासन निर्णय काढण्यात येईल, असे आश्वासन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. जिल्हयातील मुरबाड येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरुढ पुतळयाचे
अनावरण, पोलस स्टेशन मुरबाड आणि पोलीस अधिकारी/कर्मचारी वसाहत उद्घाटन समारंभात मुख्यमंत्री बोलत होते.मुख्यमंत्री म्हणाले की, शिवाजी महाराजांनी रयतेच्या कल्याणासाठी राज्य केले.
महाराजांनी सामान्य माणसाला जागृत करून त्यांच्यात ऊर्जा निर्माण केली. गेली 5 वर्षे आम्ही शिवछत्रपतींचे आशिर्वाद घेऊन काम करीत आहोत. त्यामुळे कितीही संकटे आली तरीही मार्ग काढला
आणि विकास केला. परवाच्या पुरामुळे या भागात मोठे नुकसान झाले आहे. 2005 मध्ये प्रति घरटे 5 हजार रुपये नुकसान भरपाई दिली जात होती. यात भरीव मदत करण्याचा शासन निश्चित विचार
करेल असे त्यांनी सांगितले. पुरामुळे जे रस्ते खराब झाले आहेत. त्याच्यासाठी विशेष बाब म्हणून निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे त्यांनी सांगितले. पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की,
नागपूर समृध्दी महामार्ग 24 जिल्हयांसाठी विकासावर परिणाम करणारा आहे. हा महामार्ग गेमचेंजर म्हणून ओळख देईल. बदलापूर येथील पुरग्रस्तांसाठी भरीव मदत करावी अशी त्यांनी मागणी
केली. किसन कथोरे यांनी या भागातील माळशेज घाटाला चीनच्या धर्तीवर काचेचा स्कायवॉकसाठी मंजूरी मिळावी, अशी मागणी केली.मुख्यमंत्री यांच्या हस्ते एस.टी.स्टॅण्डचे भुमिपुजन, धान्याच्या
गोदामाचेही भुमिपुजन आणि म्हसा येथील महाविद्यालयाचेही ई-भुमिपुजन करण्यात आले.