कळवा-ऐरोली उन्नत रेल्वे प्रकल्पातील बाधितांना ठाण्यात भाडेतत्वावरील घरं देण्याचा निर्णय

कळवा-ऐरोली उन्नत रेल्वे प्रकल्पातील बाधितांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याचा मार्ग मोकळा झाला असून मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या भाडेतत्वावरील घरं योजनेत २१०० घरं या प्रकल्प बाधितांना कायमस्वरूपी देण्याचा निर्णय नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतल्यामुळं प्रकल्पातील मोठा अडथळा दूर झाला आहे. ठाण्यापुढील प्रवाशांना नवी मुंबईला जायचे असल्यास सध्या ठाण्याला येऊन हार्बर रेल्वेनं जावं लागतं. त्यामुळं प्रवाशांचा नाहक वेळ जातो आणि ठाणे स्थानकात गर्दी होते. हे टाळण्यासाठी कळवा-ऐरोली उन्नत रेल्वे मार्ग व्हावा यासाठी खासदार राजन विचारे आणि श्रीकांत शिंदे यांनी रेल्वेकडे पाठपुरावा करून हा प्रकल्प मंजूर केला होता. पण या प्रकल्पातील बाधितांचं पुनर्वसन होत नसल्यामुळं हा प्रकल्प रखडला होता. आता नगरविकास मंत्र्यांनी या प्रकल्प बाधितांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी प्राधिकरणाच्या ठाण्यातील भाडेतत्वावरील घर योजनेतील २१०० घरं तातडीनं उपलब्ध करून द्यायचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची तातडीनं अंमलबजावणी करण्याचे आदेश नगरविकास मंत्र्यांनी प्राधिकरणाला दिले आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading