सांडपाण्यावर भाज्यांची लागवड करणा-यांवर कारवाई करण्याचे आदेश महापौरांनी दिले आहेत. महापौर दालनात झालेल्या एका बैठकीत महापौरांनी हे आदेश दिले. दूषित पाणी वापरून भाज्यांची लागवड ज्या ज्या ठिकाणी होत आहे त्याची चौकशी करून कारवाई करावी असे आदेश महापौरांनी या बैठकीत दिले. खासदार श्रीकांत शिंदे यांनी याबाबत तक्रार केली होती. रेल्वे मार्गाजवळच्या मोकळ्या जागेत तसंच शहराच्या विविध ठिकाणी भाजीचे मळे आहेत. कोणी बोअरवेल असल्याचं दाखवून प्रत्यक्षात मात्र मलमूत्र मिश्रीत सांडपाणी तसंच गटाराच्या पाण्यावर हा भाजीपाला पिकवत आहेत. कळवा, मुंब्रा, दिवा तसंच समतानगर, गांधीनगर, सिडको, मफतलाल कंपाऊंड परिसरात अशा पध्दतीनं पिकवलेली भाजी ठाण्यातील विविध विभागात विकली जाते. ही भाजी पिकवणे आणि विकण्यासाठी सांडपाणी मिश्रीत पाण्याचा वापर केला जात आहे. याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून कर्करोग, पोटाचे विकार, मेंदूचे विकार अशा दुर्धर आजारांना या भाज्यांचे सेवन केल्यामुळं सामोरं जावं लागत आहे. त्यामुळं अशा गलिच्छ ठिकाणी भाजी पिकवणा-यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश महापौरांनी दिले आहेत.