चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे चौघा प्रवाशांना धडक देण्याची घटना तीन हात नाका येथे घडली. पूर्व द्रूतगती महामार्गावरील तीन हात नाका सिग्नलजवळ मुंबईच्या दिशेकडील बस थांब्यावर हा अपघात घडला. ठाण्याहून मुंबईच्या दिशेनं भरधाव निघालेल्या इर्टिगा कारने बस थांब्यावर बसची प्रतिक्षा करत असलेल्या चौघा प्रवाशांना धडक दिली. यामध्ये सुनंदा तोरणे, विश्वनाथन् वेणूगोपालन हे गंभीर जखमी झाले त्यांना तातडीनं मुंबईच्या रूग्णालयात हलवण्यात आलं. घाटकोपर येथे राहणारा राकेश तावडे हा या इर्टिगाचा चालक होता. मद्याच्या नशेत कार चालवत असताना त्याचं कारवरील नियंत्रण सुटल्यानं ही दुर्घटना घडली. पोलीसांनी कार चालक तावडेला अटक केली आहे.