राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपामध्ये जाण्याच्या वाटेवर असलेल्या गणेश नाईक यांच्यावर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी घणाघाती टीका केली आहे.गणेश नाईक यांनी पद्धतशीरपणे राष्ट्रवादी संपवली. नाईक हे पाच वर्षांत पक्ष साफ करतील आणि ऐनवेळी सोडून जातील, असं आपणं वारंवार सांगत होतो. पण पक्षानं त्याकडे दुर्लक्ष केलं, अखेरीस ज्याची भीती व्यक्त केली होती तेच घडत आहे, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. गणेश नाईक यांच्यामुळेच कल्याण-डोंबिवली, भिवंडी, मीरा भाईंदर इथं राष्ट्रवादीचा एकही नगरसेवक नसल्याचा आरोप आव्हाड यांनी यावेळी केला. कल्याण डोंबिवलीत आणि मीरा भाईंदरमध्ये सत्ता असतानाही आणि भिवंडीत चांगली ताकद असतानाही आमचा एकही नगरसेवक नाही. आणि सगळ्याची जबाबदारी कोणावर होती तर गणेश नाईक यांच्यावर होती,असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं. गणेश नाईक यांनी स्वत:च्या कुटुंबाशिवाय नवी मुंबईत ठेवलंय काय ? असा सवालही जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला. पण फक्त घरच्यांचा विकास करायचा नसतो असा टोलाही त्यांनी लगावला.