गेल्या दोन दिवसात अतिवृष्टीमुळे शहरात ज्या ठिकाणी पाणी साचले होते त्या ठिकाणी साथीचे रोग पसरणार नाहीत याची दक्षता घेतानाच तेथील कचरा उचलणे, साफसफाई करणे तसेच त्याठिकाणी
फवारणी करणे आदी कामांना प्राधान्य देण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सर्व संबंधित अधिका-यांना दिले. त्याचप्रमाणे अतिवृष्टीमुळे शहरात ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत
ते खड्डे नियमितपणे भरण्यात यावेत अशा सूचनाही त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या. गेले काही दिवस शहर आणि परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे शहरात अनेक
ठिकाणी पाणी साचले होते तसेच रस्त्यांवर खड्डे पडल्याच्या प्राप्त झाल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर जयस्वाल यांनी वरिष्ठ अधिका-यांची बैठक घेवून शहरातील खड्डे तातडीने भरणे, कचरा उचलणे,
चेंबर कव्हर बसविणे तसेच शहरात फवारणी करणे आदी कामे महत्वाची असल्याने त्याला प्राधान्य द्यावे अशा सूचना दिल्या. शहरामध्ये दुषित पाण्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यावर तात्काळ
कारवाई करण्याच्या सूचना देतानाच याबाबत स्थानिक नगरसेवक आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात घेण्यात यावे असे त्यांनी अधिका-यांना सांगितले. त्याचप्रमाणे शहरातील खड्डे तात्काळ
भरण्याचेतसेच ज्या ठिकाणी सातत्याने पाणी साचते त्या ठिकाणी पावसामध्ये नियमित पाहणी करण्याचे आदेशही त्यांनी अधिका-यांना दिले. शहरामध्ये ज्या ठिकाणी चेंबर कव्हर नाहीत त्याची
पाहणी करून ती युद्ध पातळीवर बसविण्यात यावीत तसेच त्याबाबतची जबाबदारी निश्चित करून त्याच्या नियमित नोंदी करणे आणि वरिष्ठांना अहवाल सादर करण्यात यावा अशा सूचना पालिका
आयुक्तांनी या बैठकीत अधिका-यांना दिल्या.