गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा कमी पाऊस होऊनही धरणातील पाणी साठा मात्र त्या तुलनेत फारसा कमी नसल्याचं दिसत आहे. यंदा जून महिन्यात पाऊस सुरू झाला. त्यानंतर दोन महिने अधून मधून पावसानं चांगलीच हजेरी लावली पण गेल्या महिन्यात मात्र पावसानं दडी मारल्यामुळं गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस कमी झाल्याचं दिसत आहे. गेल्यावर्षी ३० सप्टेंबर पर्यंत ठाणे आणि आजूबाजूच्या परिसराला पाणी पुरवठा करणा-या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाला होता. भातसा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्यावर्षी ३ हजार २०३ मिलीमीटर पाऊस झाला तर यंदा तो २ हजार ६४ मिलीमीटर झाला आहे. म्हणजे गेल्यावर्षीच्या तुलनेत १ जून पासून ३० सप्टेंबर पर्यंत १ हजार १३९ मिलीमीटर पाऊस कमी झाला आहे. गेल्या वर्षी ३० सप्टेंबर पर्यंत भातसा धरणात जवळपास १०० टक्के पाणी साठा होता. पण यंदा मात्र तो ७४ टक्क्यांपर्यंत घसरला आहे. बारवी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही गेल्यावर्षी १ जून पासून ३० सप्टेंबर पर्यंत २ हजार ८१३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती तर यंदा २ हजार २६९ मिलीमीटर पाऊस झाला आहे म्हणजे ५४४ मिलीमीटर पाऊस कमी झाला आहे. बारवी धरणात गेल्यावर्षी ३० सप्टेंबर पर्यंत १०० टक्के पाणी साठा होता पण यंदा हा पाणी साठा ९७ टक्के आहे. त्यामुळं पाऊस कमी झाला असला तरी फारशी चिंता करण्याचं कारण दिसत नाही.