कोरोनाच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी शेवटचा उपाय म्हणून शासनानं संचारबंदी जारी केली असली तरी या संचारबंदीचा सुध्दा कितपत उपयोग होईल याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. शासनानं काल रात्रीपासून पुढील १५ दिवसांसाठी संचारबंदी जारी केली आहे. खरंतर संचारबंदीमध्ये रस्त्यावरील वावर हा शून्य होण्याची आवश्यकता आहे. मात्र सकाळच्या वेळी दिसणारी गर्दी पाहता ही संचारबंदी कितपत उपयोगी असा प्रश्न निर्माण झाला आहे. आज सकाळी नेहमीप्रमाणे रस्त्यावर वाहनं धावताना दिसत होती. लोक फिरत होते. त्यामुळं अजूनही लोकांना गांभीर्य आलं आहे असं वाटत नसल्याचंच दिसत आहे. सर सलामत तर पगडी पचास अशी एक म्हण आहे. जीव राहिला तर सर्व गोष्टी कामाच्या पण याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. एखादी गोष्ट आता मिळणारच नाही अशाप्रकारे लोकं भाजीपाला, फळं खरेदी करण्यासाठी गर्दी करत आहेत. खरंतर साथीच्या काळात एखादी गोष्ट कमी पडली तर त्यात वेळ निभावून नेता आली पाहिजे पण असं होताना मात्र सध्या दिसत नाही. त्यामुळे संचारबंदीचे १५ दिवस संपल्यानंतर ब्रेक द चेन यशस्वी न झाल्यास शेवटी कोरोनावर नियंत्रणासाठी उपाय काय हाती राहणार असा प्रश्न निर्माण झाला नाही म्हणजे मिळवलं असं एकंदरीत दिसत आहे.